Monday, April 28, 2014

स्वामींचे मालाड पूर्व येथील मंदिर

काल स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त कांदिवली पश्चिम इथल्या मठात जाण्याचा योग आला. स्वामींचे दर्शन झाले. काय तो थाट माझ्या स्वामी माऊलीचा, काय ती आरास, एकीकडे स्वामिनामाचा गजर, तर एकीकडे आरती च्या तयारीची लगबग. मन हरखून गेले होते.खूप छान दर्शन झाले. स्वामींचे.घरी परतताना  आठवण झाली,कि इथे जवळच कुण्या भक्ताने घराच्या घराच्या भिंतीवर स्वामींच्या तास्विरीची स्थापना केली होती;तिथले २ वर्षांपूर्वी दर्शन झाले होते.आज ऐन योग आला होता परत तिथे जाण्याचा.ती गल्ली शोधत शोधत गेलो. ते स्थान सापडले. एका काळोख्या गल्लीत दोन्ही बाजूला दारूचे अड्डे,चायनीज च्या गाड्या, मवाली पोरांचा धिंगाणा असं असताना समोरच एका भिंतीवर स्वामींची सात्विक शांत वत्सल तस्वीर ध्यानास आली. एका घराच्या भिंतीवर तिची स्थापना केली होति. दर्शन घेतले आणि जवळच्या काही लोकांना त्या मंदिराबाबत विचारले असता त्यांनी एका वृद्ध बाई कडे निर्देश केला,त्यांच्या जवळ जाउन चौकशी केली. त्यांचे नाव चव्हाण, अगदी स्वामींसारखीच बैठक त्यांनी मारली होती. त्या म्हणाल्या ५ वर्षापूर्वी मी इथे स्वामींचा फोटो लावला आणि पूजे-अर्चेला सुरुवात केली. माझी मुला अक्कलकोट ला पायी वारी करतात.खूप प्रचीतीआहे.स्वामी देताहेत. जागा नसल्याने घराच्या भिंतीवरच फोटोची स्थापना केली. सुरुवातीला एक निरंजन आणि अगरबत्तीने आरास केली होती. आता इथे ग्रिल बसवल्या, नियमित दोन वेळेला आरती होते. येत जा कधी कधी. त्यांच्याशी बोलून छान वाटले.
स्वामींचे मुंबईत शेकडो मठ  आहेत. त्यांची माहिती आपण संकलित करून स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
।।श्री स्वामी समर्थ।।
जय जय स्वामी समर्थ.

हा मठ मालाड पूर्वेला दफ्तरी रोड वर आहे. एस. के पाटील रूग्णालय आणि खांडवाला लेन या दोघांच्या मध्ये हि अनामिक गल्ली आहे. गल्लीत प्रवेश करतानाच समोरच स्वामींची तस्वीर दिसते.  

Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

Monday, April 14, 2014

कांदिवली गाव इथला मठ

     कांदिवली स्टेशन पश्चिम वरून चालत २० मिनिटांच्या अंतरावर कांदिवली गाव आहे.इथे जायला बस सुद्धा बर्याच आहेत.कांदिवली गाव या बस थांब्या जवळ राज हाईट नावाची एक इमारत आहे. तिथे जाऊन कुणाही स्थानिक माणसाला मठाविषयी विचारले असता मोठ्या आस्थेने तुम्हाला मठाचा पत्ता सांगितला जाईल. अक्कलकोट अपार्टमेंट च्या तळमजल्या वर हि सुंदर शांत मठी आहे.

        मठाजवळ आल्यावर विलक्षण चैतन्य, सात्विकता जाणवू लागते.फाटक उघडून आत जातानाच एक औंदुंबर आहे. मठात स्वामींची एक सुहास्यवदन तस्वीर ठेवलेली आहे.स्वामींच्या डोळ्यातले प्रेम बघून मन हरखून जाते.संगमरवरी बैठकीवर स्वामींची चैतन्यदायी मूर्ती आहे.पादुका आहेत.दर्शन घेताना खूप चैतन्य जाणवते. मठ छोटेखानी असला तरी प्रदक्षिणा मार्ग, भरपूर उजेड,खेळती हवा यामुळे ऐसपैस वाटतो,इतकी वर्ष कांदिवलीत राहत असून सुद्धा इतकी छान वस्तू इथे आहे याची मला कल्पनाच नव्हती. मला म्थाविषयी अजून माहिती हवी होती. पण संध्याकाळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळाची पालखी येणार असल्याने सर्वच गडबडीत होते. पण एका काकूंनी सांगितले कि मुंबईतल्या महत्वाच्या मठांमध्ये हा एक मठ आहे.

      श्री शंकरराव काशिनाथ मंत्री हे श्री स्वामी समर्थांचे  भक्त. त्यांनी हा मठ १९७० बांधला. २०१० मध्ये भारत मंत्री यांनी मठाचा जीर्णोद्धार केला. या मठामध्ये प.पु स्वामीभक्त आनंद भारती महाराज(लक्ष्मण कोळी-ठाणे) यांनी स्वामींच्या पादुका स्वामींच्या आज्ञेनुसार दिल्या. अक्कलकोटा जवळ च्या शिवपुरी येथील प.पु गजानन महाराज यांनी या मठाला भेटी दिल्या आहेत. चोळप्पा महाराजांचे वंशज प.पु अण्णू महाराज यांनी सुद्धा इथे भेटी दिल्या आहेत.
      इथे वेळोवेळी उत्सव साजरे केले जातात .सकाळ संध्याकाळ आरती होते. आता मठाची व्यवस्था शंकररावांच्या पुत्री मेघा ताई बघतात.

मठाचा पत्ता :
      अक्कलकोट अपार्टमेंट,श्री स्वामी समर्थ लेन,
      कांदिवली महानगर पालिका शाळेजवळ,
      कांदिवली गाव,कांदिवली पश्चिम.

मठात कसे जाल :
      कांदिवली रेल्वे स्थानक पश्चिम वरून चालत २० मिनिटांवर कांदिवली गाव हा बस थांबा आहे. इथे मागेच हा मठ आहे. तसेच कांदिवली स्थानकावरून बस नंबर २०४ आणि २०७ इथपर्यंत जातात.

मठाच्या वेळा :
        सकाळी ६ ते १२.३०
        संध्याकाळी ७ ते ९.३०
आरती सकाळी ८.३० वाजता
आणि संध्याकाळी ७ वाजता.


।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।


       

Friday, April 11, 2014

नको डगमगू स्वामी देतील साथ

पांडू सोनार

अक्कलकोटापासून ३ कोसावर मैंदर्गी नावाचे गाव आहे. तिथे पांडू सोनार नावाचा स्वामींचा भक्त राहत होता. कर्जबाजारीपणामुळे,दारिद्र्यामुळे  धनिकाला चांदीचे दागिने सोन्याचे पाणी मारून घडवून दिले.काही दिवस हि चोरी लपली.एके दिवशी झालेली हि फसवणूक धनिकाच्या लक्षात येउन त्याने पांडू सोनारावर मामलेदाराकडे फौजदारी खटला भरला. त्यात्यासाहेब मामलेदारांनी चाबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावली.  सोनाराच्या अब्रूचे भलतेच दिवाळे निघणार होते.
       सोनाराला स्वामींशिवाय आता तरणोपाय नव्हता,त्याने त्या दयाळू माउलीचा धावा सुरु केला.
हे स्वामी समर्थ माऊली,तुम्ही भक्तवत्सल आहात, मी या संसारात गंजून हे चौर्यकर्म केले आहे.मला पश्चाताप होत आहे.
स्वामी. मला वाचवा, लेकराची अब्रू वाचवा ,धाव स्वामी माउली धाव!!!!!!!
       भक्तवत्सल भक्ताभिमानी स्वामी समर्थांना सोनाराचा कळवळा आला. स्वामींची स्नानाची वेळ होती. सेवेकरी स्वामींच्या अंगावर उन पाण्याचा तांब्या घालणार इतक्यात, स्वारी गरजली.
       मेणा लाव!!
सेवेकर्यांनी मेणा आणून समर्थांचा जयजयकार करून सेवेकरी निघाले. समर्थांनी मैंदर्गीस जाण्याचा निर्देश केला. यात्रा निघाली.पुढे मैंदर्गीस आल्यावर कुण्या भक्ताकडे न जाता, कुठल्या मंदिरात,धर्मशाळेत न उतरता स्वारी थेट कचेरीत गेली. माम्लेदारास वाटले कि स्वामींनी आपला कृपाप्रसाद मज मिळावा या उद्देशाने कचेरीत येणे केले आहे. मामालेदाराने यथोचित आदर सत्कार करून आपली खुर्ची स्वामींना देववली.सोनार समोर च उभा होता.त्यास उद्देशून
'ये रे इकडे ये' !!
असे म्हणून जवळ बसावयास सांगितले. सोनार स्वामींच्या चरणाजवळ येउन बसला मामलेदारास त्याचा हेवा वाटला. स्वामींनी काही वेळाने सोनारास म्हणाले.
हं बसलास का,जा सरबराईस जा!!
असे ऐकताच पांडूने स्वामींच्या सेवेची व्यवस्था लावण्यास सुरुवात केली.दुसरे दिवशी पर्यंत सोनार स्वामींसन्निध होता. महाराजांचे त्या सोनारावरचे प्रेम पाहून मामालेदाराने पांडूची शिक्षा रद्द करून त्यास सोडून दिले. पुढे मोठ्या आनंदाने सोनाराने आपली घडलेली गोष्ट सेवेकार्यांस सांगितली असता.स्वामी स्नान करता करता मैंदर्गीस जाण्याची योजना सेवेकर्यांना कळून आली.
अशा तर्हेने 'स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे आशिर्वचन सार्थ करीत आहेत
।।श्री स्वामी समर्थ।।

Monday, April 7, 2014

लख्याची गोष्ट

एकदा मुंबईतील काही भक्त मंडळी अक्कलकोटला दर्शनास आली होती. हि सर्व बाणकोट मधील बालेमंडळी होती.त्यांत एक लख्या म्हणून लहान पोर्या होता.त्याला ब्रम्हचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास पैसे देऊन पाठवले.लख्या गुळ घेऊन येत असता त्याला मोह आवरला नाही.त्याने त्यातला गुळ खाण्यास सुरुवात केली. इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले.....'लखा भोसडीचो गुळ खाता...माका देत नाय'.....असे म्हणून स्वामी उं उं करून लहान मुलाप्रमाणे रडू लागले.
हा सगळा प्रकार पाहून त्यातील काही मंडळी बाजारकडे गेली.तेव्हा लख्या येता येता गुळ खाताना दिसला....तेव्हा समर्थांच्या कृतीचा सर्वांना उगम झाला.
स्वामी माउली कधी कधी अशीच गम्मत करत असे.कुणी दर्शनास आले कि त्यास त्याच्या मनातील ओळखून त्याची खुण पटवून देत. कधी कुणी परगाव चा अन्यभाषिक भक्त आला त्याला त्याच्या भाषेत बोलून अन्तःसाक्षित्वाची प्रचीती देत.
त्यांच्या जवळ एक पितळेची कडी होती.त्या कडीवर गणपती,लक्ष्मी,विष्णू अशा देवांची चित्रे कोरलेली होती.कुणी भक्त आला त्यास त्याच्या उपास्य इष्टदेवतेच्या चित्रावर बोट ठेवून त्यास खुण पटवून देत.

।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।

Tuesday, April 1, 2014

उद्धवाने उद्धार हा केला

आज चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकटदिन.

इ.स १४५७ च्या दरम्यान श्रीनृसिंह सरस्वती गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन करून श्री शैल्य यात्रेला निघाले. आणि कर्दळी वनात गुप्त झाले. तिथे त्यांना समाधी लागली. तब्बल ३०० वर्ष समाधीवस्थेत असल्याने त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारूळ निर्माण झाले होते. आता नवीन अवतार व्हावयाचा होता.नास्तिकांना आस्तीकतेचा मार्ग सुलभ करून द्यावयाचा होता.कर्मकांड,धर्मभोळेपणा,जातपातीची माणुसकीला लागलेली कसर दूर करावयाची होती. दुखी,गांजलेले तारावयाचे होते.
यासाठी निमित्त हवा होतं. निमित्त उद्धव लाकूडतोड्या झाला.
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||