Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||