Friday, February 28, 2014

अध्याय १३

। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।

बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज,श्रीपादभट,भुजंगा,शिवूबाई यांच्या समवेत  समर्थांचे कोडॅक कंपनीच्या प्रतिनिधीने काढलेले छायाचित्र.

॥ श्री गणेशाय नमः ॥ शुक्लपक्षीचा शशिकर । वाढे जैसा उत्तरोत्तर । तैसे हे स्वामी चरित्र । अध्यायाध्यायी वाढले ॥१॥ द्वादशाध्यायाचे अंती । श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती । कपट युक्तीने फसवू पाहती । परी झाले व्यर्थची ॥२॥ खिन्न झाला चोळप्पा । म्हणे श्रींची पूर्ण कृपा । मजहुनी तया बाळाप्पा । प्रिय असे जाहला ॥३॥ वर्तले ऐसे वर्तमान । बाळाप्पा एकनिष्ठा धरोन । स्वामीसेवा रात्रंदिन । अत्यानंदे करितसे ॥४॥ स्वयंपाकादिक करावयासी । लज्जा वाटतसे तयासी । तयाते एके समयासी । काय बोलती समर्थ ॥५॥ निर्लज्जासी सन्निध गुरु । असे जाण निरंतरु । ऐसे बोलता सद़्गुरु । बाळाप्पा मनी समजला ॥६॥ अनेक उपाये करोन । शुद्ध केले बाळाप्पाचे मन । स्वामीविणे दैवत अन्य । नसेचि थोर या जगी ॥७॥ सेवेकऱ्यांमाजी वरिष्ठ । सुंदराबाई होती तेथ । तिने सेवेकऱ्यास नित्य । त्रास द्यावा व्यर्थची ॥८॥ नाना प्रकारे बोलोन । करी सर्वांचा अपमान । परी बाळाप्पावरी पूर्ण । विश्वास होता तियेचा ॥९॥ परी कोणे एके दिवशी । मध्यरात्रीच्या समयासी । लघुशंका लागता स्वामींसी । बाळाप्पाते उठविले ॥१०॥ श्रींते धरोनिया करी । घेउनी गेले बाहेरी । पाहोनिया ऐशी परी । बाई अंतरी कोपली ॥११॥ म्हणे याने येवोन । स्वामी केले आपणा आधीन । माझे गेले श्रेष्ठपण । अपमान जाहला ॥१२॥ तैपासूनी बाळाप्पासी । त्रास देत अहर्निशी । गाऱ्हाणे सांगता समर्थांसी । बाईते शब्दे ताडिती ॥१३॥ अक्कलकोटी श्रीसमर्थ । प्रथमतः ज्याचे घरी येत । चोळाप्पा विख्यात । स्वामीभक्त जाहला ॥१४॥ एक तपपर्यंत । स्वामीसेवा तो करीत । तयासी द्रव्याशा बहुत । असे सांप्रत लागली ॥१५॥ दिवाळीचा सण येत । राजमंदिरामाजी समर्थ । राहिले असता आनंदात । वर्तमान वर्तले ॥१६॥ कोण्या भक्ते समर्थांसी । अर्पिले होते चंद्रहारासी । सणानिमित्त त्या दिवशी । अंगावरी घालावा ॥१७॥ राणीचिये मनांत । विचार येता त्वरित । सुंदराबाईसी लोबत । चंद्रहार द्यावा की ॥१८॥ सुंदराबाई बोलली । तो आहे चोळप्पाजवळी । ऐसे ऐकता त्या काळी । जमादार पाठविला ॥१९॥ गंगुलाल जमादार । चोळाप्पाजवळी ये सत्वर । म्हणे द्यावी जा चंद्रहार । राणीसाहेब मागती ॥२०॥ चोळाप्पा बोले तयांसी । हार नाही आम्हापासी । बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ॥२१॥ ऐसे ऐकुनी सत्वर । गंगुलाल जमादार । बाळाप्पाजवळी येउनी सत्वर । हार मागू लागला ॥२२॥ बाळाप्पा बोले सत्वर । आपणापासी चंद्रहार । परी चोळप्पाची त्यावर । सत्ता असे सर्वस्वे ॥२३॥ ऐसे ऐकुनी बोलणे । जमादार पुसे चोळाप्पाकारणे । जबाब दिधला चोळप्पाने । बाळाप्पा देती तरी घेईजे ॥२४॥ ऐसे भाषण ऐकोन । जमादार परतोन । नृपमंदिरी येवोन । वर्तमान सर्व सांगे ॥२५॥ चोळाप्पाची ऐकुन कृती । राग आला राणीप्रती । सुंदराबाईनेही गोष्टी । तयाविरुद्ध सांगितल्या ॥२६॥कारभार चोळाप्पाचे करी । जो होता आजवरी । तो काढूनी तयास दूरी । करावे राणी म्हणतसे ॥२७॥ पहिलेच होते बाईच्या मनी । साहाय्य झाली आता राणी । सुंदराबाईचा गगनी । हर्ष तेव्हा न समावे ॥२८॥ चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी । धनप्राप्ती तया भारी । समर्थकृपेने होतसे ॥२९॥ असो एके अवसरी । काय झाली नवलपरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टीत ॥३०॥ एक वस्त्र तया वेळी । पडले होते श्रींजवळी । तयाची करोनिया झोळी । समर्थे करी घेतली ॥३१॥ अल्लख शब्द उच्चारिला । म्हणती भिक्षा द्या आम्हाला । तया वेळी सर्वत्राला । आश्चर्य वाटले ॥३२॥ झोळी घेतली समर्थे । काय असे उणे तेथे । जे जे दर्शना आले होते । त्यांनी भिक्षा घातली ॥३३॥ कोणी एक कोणी दोन । रुपये टाकती आणोन । न लागता एक क्षण । शंभरावर गणती झाली ॥३४॥ झोळी चोळाप्पाते देवोन । समर्थ बोले काय वचन । चोळाप्पा तुझे फिटले रीण । स्वस्थ आता बसावे ॥३५॥ पाहोनिया द्रव्यासी । आनंद झाला तयासी । परी न आले मानसी । श्रीचरण अंतरले ॥३६॥ तयासी झाले मास दोन । पुढे काय झाले वर्तमान । राणीच्या आज्ञेने शिपाई दोन । स्वामीजवळी पातले ॥३७॥ त्यांनी उठवून चोळाप्पासी । आपण बैसले स्वामीपाशी । चोळाप्पाच्या मानसी । दुःख फार जाहले ॥३८॥ स्वामीपुढे वस्तु येती । त्या शिपाई उचलिती । चोळाप्पाते काही न देती । ने तरी घेती हिरावोनी ॥३९॥ चोळाप्पासी दूर केले । बाईसी बरे वाटले । ऐसे काही दिवस गेले । बाळाप्पा सेवा करिताती ॥४०॥ कोणे एके अवसरी । सुंदराबाई बाळाप्पावरी । रागावोनी दृष्टोत्तरी । ताडण करी बहुसाळ ॥४१॥ ते ऐकोनी बाळाप्पासी । दुःख झाले मानसी । सोडून स्वामीचरणांसी । म्हणती जावे येथोनी ॥४२॥ ऐसा केला विचार । जाहली असता रात्र । बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर । खिन्न झाले मानसी ॥४३॥ आज्ञा समर्थांची घेवोनी । म्हणती जावे येथोनी । याकरिता दुसरे दिनी । समर्थांजवळी पातले ॥४४॥ आपुली आज्ञा घ्यावयासी । बाळाप्पा येतो या समयासी । अंतर्ज्ञानी समर्थांसी । तत्काळ विदित जाहले ॥४५॥ तेव्हा एक सेवेकऱ्यांस । बोलले काय समर्थ । बाळाप्पा दर्शनासी येत । त्यासी आसन दाखवावे ॥४६॥ बाळाप्पा येता त्या स्थानी । आसन दाविले सेवेकऱ्यांनी । तेव्हा समजले निजमनी । आज्ञा आपणा मिळेना ॥४७॥ कोठे मांडावे आसन । विचार पडला त्यालागून । तो त्याच रात्री स्वप्न । बाळाप्पाने देखिले ॥४८॥ श्रीमारुतीचे मंदिर । स्वप्नी आले सुंदर । तेथे जाउनी सत्वर । आसन त्यांनी मांडिले ॥४९॥ श्रीस्वामी समर्थ । या मंत्राचा जप करीत । एक वेळ दर्शना येत । हिशेब ठेवीत जपाचा ॥५०॥ काढूनी दिले बाळाप्पासी । आनंद झाला बाईसी । गर्वभरे ती कोणासी । मानीनाशी जाहली ॥५१॥ सुंदराबाईसी करावे दूर । समर्थांचा झाला विचार । त्याप्रमाणे चमत्कार । करोनिया दाविती ॥५२॥ जे कोणी दर्शना येत । त्यांसी बाई द्रव्य मागत । धन-धान्य साठवीत । ऐशा प्रकारे करोनी ॥५३॥ बाईची कृत्ये दरबारी । विदित केली थोर थोरी । बाईनी रहावे दूरी । श्रींचरणापासून ॥५४॥ परी राणीची प्रिती । बाईवरी बहू होती । याकारणे कोणाप्रती । धैर्य काही होईना ॥५५॥ अक्कलकोटी त्या अवसरी । माधवराव बर्वे कारभारी । तयांसी हुकूम झाला सत्वरी । बाईसी दूरी करावे ॥५६॥ परी राणीस भिवोनी । तैसे न केले तयांनी । समर्थ दर्शनासी एके दिनी । कारभारी पातले ॥५७॥ तयांसी बोलती समर्थ । कैसा करिता कारभार । ऐसे ऐकोनिया उत्तर । बर्वे मनी समजले ॥५८॥ मग त्यांनी त्याच दिवशी । पाठविले फौजदारासी । कैद करुनिया बाईसी । आणावी म्हणती सत्वर ॥५९॥ आज्ञेप्रमाणे सत्वर । बाईसी बांधी फौजदार । बाई करी शोक फार । घेत ऊर बडवूनी ॥६०॥ फौजदारासी समर्थ । काही एक न बोलत । कारकीर्दीचा अंत । ऐसा झाला बाईचा ॥६१॥ स्वामीचिया सेवेकरिता । सरकारांतूनी तत्त्वता । पंच नेमूनी व्यवस्था । केली असे नृपराये ॥६२॥ मग सेवा करावयासी । घेउनी गेले बाळाप्पासी । म्हणती देऊ तुम्हांसी । पगार सरकारांतूनी ॥६३॥ बाळाप्पा बोलले तयांसी । द्रव्याशा नाही आम्हांसी । आम्ही निर्लोभ मानसी । स्वामीसेवा करु की ॥६४॥ बाळाप्पाचा जप होता पूर्ण । एका भक्तास सांगोन । करविले श्रींनी उद्यापन । हिशेब जपाचा घेतला ॥६५॥ बाळाप्पांनी चाकरी । एक तप सरासरी । केली उत्तम प्रकारी । समर्था ते प्रिय जाहले ॥६६॥ अक्कलकोट नगरात । अद्यापि बाळाप्पा रहात । श्रीपादुकांची पूजा करीत । निराहार राहोनी ॥६७॥ जे जे झाली स्वामीभक्त । त्यात बाळाप्पा श्रेष्ठ । तयावरी श्री समर्थ । करीत होते प्रेम बहू ॥६८॥ ऐसे बाळाप्पाचे चरित्र । वर्णिले असे संकलित । स्वामी चरित्र सारामृत । चरित्रसार घेतले ॥६९॥ दृढनिश्चय आणि भक्ती । तैसी सद़्गुरुचरणी आसक्ति । तेणे येत मोक्ष हाती । अन्य साधने व्यर्थची ॥७०॥ दृढनिश्चयाचे उदाहरण । हे चरित्र असे पूर्ण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी आदर धरावा ॥७१॥ उगीच करिती दांभिक भक्ती । त्यावरी स्वामी कृपा न करिती । सद़्भावे जे नमस्कारिती । त्यावरी होती कृपाळू ॥७२॥ पुढले अध्यायी सुंदर कथा । ऐका श्रोते देऊनी चित्ता । जेणे निवारे सर्व व्यथा । पापराशी दग्ध होती ॥७३॥ अक्कलकोटनिवासिया । जयजयाजी स्वामीराया । रात्रंदिन तुझ्या पाया । विष्णू शंकर वंदिती ॥७४॥ इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥७५॥


॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
)

Wednesday, February 26, 2014

श्री गणेश आणि स्वामी!!


गणपती वर स्वामींचे खूप प्रेम होते. अक्कलकोटात त्यांनी ठीक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. वटवृक्ष मंदिरामधल्या गणेशाची स्थापना सुद्धा स्वामींनी स्वहस्ते केली.
अक्कलकोट च्या जुन्या राजवाड्यात स्वामींची स्वारी बर्याचवेळा जाई. राजवाड्याचा भव्य दरवाजा तब्बल १२ ते १५ फुट उंच. दरवाज्याला एक झरोका आहे. सामान्य माणूस दरवाज्याच्या झरोक्यातून सहज आत बाहेर करू शकतो. दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या भागात गणपतीची लाकडात कोरलेली एक तस्वीर आहे. त्या तस्विरीला येता जाता स्वामी सहज लीलया हात लावीत आणि म्हणत 'मेरा गण्या'


एका औंसत मनुष्याला हात वर करून, पायाच्या टाचा उंचावून सुद्धा तिथे पोहोचणे शक्य नाही. स्वामी दाशरथि रामाप्रमाणे आजानुबाहू(त्यांचे हात गुढग्यापर्यंत लांब होते) होते.

स्वामी समर्थ समाधी मठ. चोळप्पा महाराजांचे घरी.



विश्वव्यापक विश्वंभरु|
त्याची कैची समाधी निर्धारु|
जगी जगप्रकार दाखवणे साचारु|
लीला थोरु समर्थांची||
-सद्गुरू आनंदनाथ महाराज.

स्वामींचा परम भक्त चोळ्या याची इच्छा अशी होती कि समर्थांचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे. अशा धर्मभोळे पणातून स्वामी समर्थ असतानाच एके दिवशी चोळप्पानी आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदावयास घेतली. चोळाप्पा समाधी खोदत होता इतक्यात स्वामींची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. आणि समर्थांनी मुद्दामून विचारले 'काय रे चोळ्या काय करतोस?" चोळप्पाने काहीच उत्तर नाही दिले. त्याला वाटले कि स्वामींना काहीच सांगितले
नाही तर त्यांना कशासाठी हा खटाटोप चाललाय हे कळणार नाही. स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रम्ह होते, स्वामींच्या अन्तःसाक्षित्वाची प्रचीती चोळप्पाने वारंवार अनुभवली असूनही चोळाप्पांची प्राकृत बुद्धी त्यावेळी चालली नाही.
स्वामी त्याला म्हणाले 'चोळ्या यात आधी तुला घालीन मग च मी जाईन'. पुढे चोळप्पा महाराजांचे निधन झाले.त्यानंतर काही वर्षांनी स्वामी समर्थांचे निर्वाण झाले. आणि भक्ताच्या इच्छे खातीर चोळप्पाच्या घरी समाधी मठ आहे.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा समाधी मठ आहे. दररोज हजारो भक्तांची रीघ तिथे लागलेली असते. मठात आल्यावर परम समाधान लाभते.बाजूलाच चोळप्पा महाराजांचे घर आहे. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्या पहावयास मिळतात. स्वामींनी अक्कलकोटात येउन दुसरी लीला चोळप्पाच्या घरी केली ती म्हणजे ऐन दुष्काळात चोळप्पाच्या विहीर सुकी खडखडीत असताना तीत लघुशंका करून तिला पाणी आणवले. आज कितीही दुष्काळ असला म्हणजे ती विहीर कधीच आटत नाही. ती विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.

Monday, February 24, 2014

मिलिंदमाधव कृत स्वामी स्तोत्र.


श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय नमः |      


नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना
विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || ||

नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती
ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || ||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया
स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन
करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां
स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ||

नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे
कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें
तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं
स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ||

कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण
आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण |
 तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||

मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान |
 काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें
ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण
सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण
दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार
तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले
तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला
जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण
अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे
आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे
तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार
अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी
भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना
शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार
कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली
जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद
झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||

स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें
अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती
ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||

कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या
कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें
कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार
अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी
म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||

सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें
लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार
अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया
हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी
सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं
मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा
ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी
तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी
आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||

अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं
ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी
आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी
काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी
मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला
भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे
त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्यांनी
गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें
हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ
स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी
पुण्य घटिका तिसर्या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल
क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार
स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार
निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली
सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली
समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला
अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना
संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले |
म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी
स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था
सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून
समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून
तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी
ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख
गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा
उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य
म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून
या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा
वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी
शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत
बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर
एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||

एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती
ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न
करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||

श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )

|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||


|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||