Monday, April 28, 2014

स्वामींचे मालाड पूर्व येथील मंदिर

काल स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त कांदिवली पश्चिम इथल्या मठात जाण्याचा योग आला. स्वामींचे दर्शन झाले. काय तो थाट माझ्या स्वामी माऊलीचा, काय ती आरास, एकीकडे स्वामिनामाचा गजर, तर एकीकडे आरती च्या तयारीची लगबग. मन हरखून गेले होते.खूप छान दर्शन झाले. स्वामींचे.घरी परतताना  आठवण झाली,कि इथे जवळच कुण्या भक्ताने घराच्या घराच्या भिंतीवर स्वामींच्या तास्विरीची स्थापना केली होती;तिथले २ वर्षांपूर्वी दर्शन झाले होते.आज ऐन योग आला होता परत तिथे जाण्याचा.ती गल्ली शोधत शोधत गेलो. ते स्थान सापडले. एका काळोख्या गल्लीत दोन्ही बाजूला दारूचे अड्डे,चायनीज च्या गाड्या, मवाली पोरांचा धिंगाणा असं असताना समोरच एका भिंतीवर स्वामींची सात्विक शांत वत्सल तस्वीर ध्यानास आली. एका घराच्या भिंतीवर तिची स्थापना केली होति. दर्शन घेतले आणि जवळच्या काही लोकांना त्या मंदिराबाबत विचारले असता त्यांनी एका वृद्ध बाई कडे निर्देश केला,त्यांच्या जवळ जाउन चौकशी केली. त्यांचे नाव चव्हाण, अगदी स्वामींसारखीच बैठक त्यांनी मारली होती. त्या म्हणाल्या ५ वर्षापूर्वी मी इथे स्वामींचा फोटो लावला आणि पूजे-अर्चेला सुरुवात केली. माझी मुला अक्कलकोट ला पायी वारी करतात.खूप प्रचीतीआहे.स्वामी देताहेत. जागा नसल्याने घराच्या भिंतीवरच फोटोची स्थापना केली. सुरुवातीला एक निरंजन आणि अगरबत्तीने आरास केली होती. आता इथे ग्रिल बसवल्या, नियमित दोन वेळेला आरती होते. येत जा कधी कधी. त्यांच्याशी बोलून छान वाटले.
स्वामींचे मुंबईत शेकडो मठ  आहेत. त्यांची माहिती आपण संकलित करून स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
।।श्री स्वामी समर्थ।।
जय जय स्वामी समर्थ.

हा मठ मालाड पूर्वेला दफ्तरी रोड वर आहे. एस. के पाटील रूग्णालय आणि खांडवाला लेन या दोघांच्या मध्ये हि अनामिक गल्ली आहे. गल्लीत प्रवेश करतानाच समोरच स्वामींची तस्वीर दिसते.  

Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||